हॅलो.. हॅलो.. कुणी आनंदी, समाधानी आहे का इथे? कुणीतरी खरं खरं हसून दाखवेल का मला?
मलाच का? - कारण आत्ता मी प्रश्न विचारतोय म्हणून..
पण का? कशासाठी? कोणाचा राग येतोय आपल्याला सगळ्यांना? कोणावर इतकी चिडचिड करतोय आपण सगळे? कुणाचंच, काहीच पटत नाहीये का आपल्याला? का आपल्याला आपलंसुद्धा काहीच आवडत नाहीये?
तसं सगळं छान चालू आहे तुमचं-आमचं.. पैसा मिळतोय बरा.. प्रेम-बिमसुद्धा मिळतंय, बाकी संस्कृती-कला वगैरेसुद्धा ठीकठाक.. तसं अजून काय लागतं माणसाला? थोरांना नमस्कार केल्यावर ते आशीर्वाद देतायत आणि लहान असलेले बऱ्यापैकी आदर वगैरे देतायत.. तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर का बरं कसलातरी ताण दिसतोय?
ऋतूंवरसुद्धा राग काढतो आपण.. म्हणतो, पाऊस कधीही पडतो आजकाल.. काही शिस्तच नाही उरलेली.. हिवाळा, उन्हाळा काहीही असो, मनात आलं की कोसळतो. कुणीतरी म्हणतं की पाऊससुद्धा झालाय माणसांसारखाच बेजबाबदार, लहरी! खरंच तुमच्याशी असं वागलंय का कोणी? आठवा ना! जिथे जिथे अपेक्षा होती, अगदी बालवाडीच्या अॅडमिशनपासून ते अमेरिकेला शिकायला निघालात तोपर्यंत, वडील उभे होते ना पाठीशी? आणि तितक्याच काळजीने आई आजही जेष्ठमधाचा काढा करून देते ना तुम्ही न मागता, तुम्हाला जरासा ठसका येतो असं वाटल्यावर? मग? उगाचच का एकटं-बिकटं पडल्याचा दावा? का फॅशन आलीये आजकाल ‘एकटेपणा’ दाखवायची?
सकाळी उठताक्षणी पेपर वाचावासा तर वाटतो, पण वाचता-वाचता तिसऱ्या मिनिटाला, ‘काही नसतं आजकाल पेपरात वाचायला’ असं म्हणायलाच हवं का? मुळात राजकारण मला आवडत नाही.. खेळाचं सध्या राजकारण झालंय.. एकही चांगला सिनेमा नाहीये सध्या.. तीच-तीच गाणी गातात सगळ्या वाद्यवृंदात.. नटय़ांना मुळीच डोकं नसतं.. लेख वाचायला मला बोअर होतं.. आणि खूप काही असं डोक्यात घेऊनच पेपर का वाचता? बघा की, काहीतरी छान असेलच की.. आणि ‘काहीतरी’ मला अजिबात आवडत नाही असं ठामपणे म्हणणाऱ्याला ‘काहीतरी’ आवडतही असलं पाहिजे.. ‘पालकत्व’ या विषयावरचे लेख यांना आवडत नाहीत. कारण मुळात ‘शी.. त्यात काय शिकायचंय?’ ही वृत्ती. हे लेख, व्याख्यानं, समुपदेशन वगैरे सगळं उगाचच मॉडर्नपणाच्या हौसेने केलं जातं असंच वाटत असतं यांना. जंगल, प्राणी, आदिवासींचं पुनर्वसन हे सगळं कक्षेबाहेरचं वाटतं. ‘क्रिकेटरचं अभिनेत्रीशी लग्न ठरलं त्याला वधुपित्याचा विरोध’ हे वाचणं बालीशपणाचं वाटतं. ‘सूर्य पृथ्वीच्या जवळ येतोय का?’ हे वाचणं अनावश्यक वाटतं. आणि ‘घरातल्या व्यक्तींशी संवाद वाढवा’ हे वाचणं कमीपणाचं वाटतं.. एकूणच आजकाल आपण ज्या विश्वात जगतोय किंबहुना ज्यात नाईलाजाने जगावं लागतंय ते विश्व, ती माणसं या साऱ्यांमध्ये ‘मी’ कसा वेगळा, एकटा, त्रयस्थ आहे, असंच वाटून घेण्याची सवय लागलीये सगळ्यांना..
समोरचा माणूस आपल्याशी जे बोलतोय, ते शंभर टक्के खरं असूच शकत नाही, असं का समजायला लागलोय आपण? एखाद्याने सहज नाव विचारलं तरी आपण नाव सांगून लगेच ‘का हो?’ असा प्रश्न विचारायलाच हवा का? एका माणसाला दुसऱ्याचं नाव जाणून घ्यावसं वाटणं यात काही संशयास्पद आहे का? कुणी जास्त कौतुक केलं तरी भीती वाटावी, असं का व्हावं आपलं? कुणाला कुणाशी मनापासून गप्पा माराव्याशा वाटल्या तर त्यांची भागिदारी, स्वार्थ, दूरदर्शी योजना यापैकी काहीतरी असणार आणि त्या दोन व्यक्ती जर एक स्त्री आणि एक पुरुष असतील तर ‘लग्न’ किंवा ‘लफडं’ यापैकी असणार- हे मानायला लावणारी कोणती वृत्ती जोपासतोय आपण सगळे? आणि हे सगळं करून आरशात बघण्याचा निर्लज्जपणा आहेच.. वर म्हणायला मोकळे, ‘आजकाल कुणावरही भरवसा करावासा वाटत नाही..’ आयुष्यात कधीही दहा पैशालाही कुणी फसवलं नसतानाही काय कारण आहे कुणावरही भरवसा नसण्याचं?
रंगमंचावरून कोणी खरं बोलतं, यावर तर हल्ली बालवाडीतील मुलंसुद्धा विश्वास ठेवत नाहीत. माईक हातात घेतलेला माणूस हा समोरच्याला गोड-गोड बोलून गुंडाळण्यासाठीच आला आहे, असंच हे मानतात आणि सगळ्यांना सांगून पटवूनही देतात. कोणी खूप थेट खरं बोललं की त्याला उद्धट, प्रक्षोभक म्हणायचं आणि कुणी योजनाबद्ध, मुद्देसूद बोललं की त्याला धूर्त, लबाड, राजकारणी म्हणायचं.. आजकाल कोणाला कोणाचंच भाषण आवडत नाही का? सगळंच फसवं का वाटून घेऊ लागलेत सगळे? रंगमंचावरून एक वक्ता जेव्हा दुसऱ्याबद्दल खूप चांगलं बोलतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला पचत नाही.. मग लगेच कोणीतरी म्हणणार ‘आता काय एकमेकांचा कौतुक समारंभ वाटतं?’ अहो पण करू द्या की कौतुक कुणालातरी कुणाचं.. तुमचं केलं तरी तुम्हाला आवडत नाही आणि दुसऱ्याचं तर नाहीच नाही.. असं का? काय झालंय काय?
समारंभात खूप लोकांमध्ये बसल्या बसल्या नवरा बायको एकमेकांना विनोदांच्या आडून टोमणे मारतात.. का? घरी समोरासमोर बसलात तर विषय तळापर्यंत जाईल आणि खूप अवघड प्रश्न येतील दोघांसमोरही.. आयुष्यात शाळा, कॉलेजच्या सगळ्या परीक्षा मिळून जितके प्रश्न ऑप्शनला टाकले नाहीत, तितके संसारात टाकलेत म्हणून? मित्र-मैत्रिणी म्हणून एकत्र येऊन मग नवरा-बायको झालेल्यांच्या आयुष्यात ती ‘मैत्री’ कुठे जाते? मग का हवीहवीशी वाटतेय एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून फक्त ‘स्वत:ची’ जागा? खरंच प्रश्न इतके अवघड आहेत?
हातात आलेलं प्रत्येक नाणं आणि गाणाऱ्यांचं प्रत्येक गाणं खोटं का असेल? गाणं असो वा जगणं, सगळ्या स्पर्धाचे निकाल आधीच ठरवले जातात, असं का ठरवून टाकलंय सगळ्यांनी? प्रत्येक रस्ता हा खड्डय़ांचाच असणार आणि ते कधीही भरून येणार नाहीत, कारण त्यात भेसळ असणारच- हेही आपण ठरवूनच टाकलंय..
नेता म्हणजे खोटी आश्वासनं.. पोलीस म्हणजे लाच.. कलाकार म्हणजे व्यसन.. खेळाडू म्हणजे फिक्सिंग.. तरुण म्हणजे बेजबाबदार.. नवरा म्हणजे अरेरावी.. सासू म्हणजे जाच.. सून म्हणजे उद्धट.. व्यापारी म्हणजे फसवणूक.. सेल्समन म्हणजे चोर.. ट्रक ड्रायव्हर म्हणजे दारू.. वचन म्हणजे मोडणारच आणि नियम म्हणजे तोडणारच. देऊळ म्हणजे चप्पल-चोर आणि व्याख्यान म्हणजे नक्की बोअर- हे सगळं.. सगळं.. विसरून.. बरं विसरू नका, किमान दोन क्षण बाजूला ठेवून थोडा मोकळा श्वास घेऊया?
एक दिवस.. फक्त एक दिवस सकाळपासूनच हसून बघूया घराच्या छताकडे? आणि मग शोधूया पेपरमध्ये काय छान आहे.. समोरचा माणूस खोटं बोलतोय, हे माहीत असूनही त्याच्या खांद्यावर आपली मान टाकून झोपून जाऊया.. मग त्यालाही वाटेल खरं बोलावसं! एखाद्या बालवाडीसमोरून जाताना पाच मिनिटं थांबूया आणि त्या निरागस चेहऱ्यांकडे बघताना एकदाच आठवून बघूया की आपणही इतकंच स्वच्छ, मोकळं हसत होतो, हसू शकतो! ही मुलं किती सहज डब्यांची वाटावाटी करतायत.. आणि त्यांच्या मनाच्या कोपऱ्यांतसुद्धा वाटावाटी करणाऱ्या मित्रांचं आडनावही येत नाही आणि त्याच्या वडिलांचा हुद्दा किंवा पगारसुद्धा!
आपण हसू शकतो.. नक्कीच खरं वागूही शकतो.. पण आपणच बांधून घेतलंय स्वत:ला उगाचच.. एकटेपणा, वेगळेपणा, अन्याय, विषमता वगैरे शब्दांमध्ये.. असं थोडीच मरणार आपण ओढलेल्या चेहऱ्यांनं? तो क्षण प्रत्येकासाठी अटळ असणारच, पण त्या आधी एकदा खरं खरं हसूया? एकदाच!!!!
- सलील कुलकर्णी .
No comments:
Post a Comment